सोमवार, १८ डिसेंबर, २००६

पृथ्वीचे प्रेमगीत - कुसुमाग्रज

पृथ्वीचे प्रेमगीत
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

२४ टिप्पण्या:

  1. भौगोलिक सत्य आणि कविकल्पना यांची मनोहारी सांगड घालून रचलेली नितांत सुंदर कविता.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. भौगोलिक सत्य हेच की सूर्य तिचा पिता प्रियकर वा मित्र नाही । मंगळ ,शुक्र,चंद्र,ध्रुव तिची भावंडे, धूमकेतू हाही तिचा भाऊ।त्यामुळे कविता कुसुमाग्रजांच्या सुपीक डोक्यातून त्यांचा शृंगार रस घेऊन अवतरली । कुसुमाग्रजांना मुलं नाहीत , बायको होती , ती पृथ्वी व ते भास्कर ही कल्पना कशावरून नाही ।? इतर तिचे मित्र ,वा स्नेहीही वा दीर असू शकतात| म्हणून ते कल्पना करू शकले ।

      हटवा
  2. मला सुर्याचे प्रेम गीत ही कवीता कुणी सांगेल का?

    उत्तर द्याहटवा
  3. दुरून डोंगर साजरे असा ह्याचा अर्थ. म्हणजे आवाक्याबाहेरचे स्वप्न, मग ते प्रेमाचे असो की संपत्तीचे, बघायलाच नको.

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतीम कविता.
    शाळेत असताना खूप वर्षांपूर्वी अभ्यासासाठी वाचली होती. तेव्हापासून या कवितेचे गारूड अजूनही कायम आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. खरंच खूप सुंदर कल्पना.पृथ्वीचे सूर्याशी असलेले निस्सीम प्रेम यातून व्यक्त झाले आहे.ईतके सारे ग्रह तारे आकाशात असतांना तिला फक्त आणि फक्त सूर्याचीच साथ हवी आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. भौगोलिक परिस्थिती व सत्य तात्या साहेबांच्या कवी कल्पनेतून आलेली सुंदर कविता.

    उत्तर द्याहटवा
  7. संयमित प्रेमाची छटा असणारी कुसुमाग्रज यांची अलौकिक कविता. आज २२एप्रिल वसुंधरा दिना निमित्त आठवली.

    उत्तर द्याहटवा
  8. फारच सुंदर...अप्रतिम कल्पना.... माझं अत्यंत आवडतं काव्य....कवीला लाख लाख प्रणाम

    उत्तर द्याहटवा
  9. खर तर कुसुमाग्रज यांच्या सर्वच कवीता अप्रतीम,प्रत्येक कविताच गर्भ मात्र वेगवेगळा,अद्भुत शब्दयोजना
    कणा, मातीची दर्पोक्ती , क्रांतीचा जयजयकार, विराट वड, मुर्तीभंजक याही कविता मानवी मनाचा ठाव घेतात.

    उत्तर द्याहटवा
  10. नकोस पसरू मोहक बाहू हा मृदुल बंध कोठवर साहू.....ही कविता हवी आहे मला

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. रहावया मज प्रिये, मनोहर
      कनकाचा घडविलास पंजर
      छतास बिलगे मोत्यांचा सर
      या सलत शृंखला तरी चरणी
      तरी मुक्त विहंगम हा रमणी.!

      तुझ्या कराचा विळखा पडतां
      तव वक्षाच्या उबेत दडतां
      गमे जिण्याची क्षण सार्थकता
      परी अंतरी करी आक्रोश कुणी
      करी मुक्त विहंगम हा रमणी.!!

      नकोस पसरू मोहक बाहू
      मृदुल बंध हे कुठवर साहू
      नव-नावीक मी कुठवर राहू
      या आकुंचित जगी गुदमरूनी
      करी मुक्त विहंगम हा रमणी..!!

      हटवा
    2. रहावया मज प्रिये, मनोहर
      कनकाचा घडविलास पंजर
      छतास बिलगे मोत्यांचा सर
      या सलत शृंखला तरी चरणी
      तरी मुक्त विहंगम हा रमणी.!

      तुझ्या कराचा विळखा पडतां
      तव वक्षाच्या उबेत दडतां
      गमे जिण्याची क्षण सार्थकता
      परी अंतरी करी आक्रोश कुणी
      करी मुक्त विहंगम हा रमणी.!!

      नकोस पसरू मोहक बाहू
      मृदुल बंध हे कुठवर साहू
      नव-नावीक मी कुठवर राहू
      या आकुंचित जगी गुदमरूनी
      करी मुक्त विहंगम हा रमणी..!!

      हटवा
  11. परी भव्य ते तेज पाहून पुजुन घेऊ गळ्याशी कसे काजवे? नको क्षृद्र श्रूगार तो दुर्बळांचा तुझी दुरता त्याहुनी साहवे!.................................... दिव्य दिक्षा मंत्रा सारखे हे शब्द कानी पडताचं आपण थरकतो, चमकतो, अंतर्मुख होतो. आंम्हा माणसांच्या शृंगाराचा कस मनातल्या मनात तपासतो
    पृथ्वीचे हे प्रेमगीत अथपासून इतिपर्यंत समर्थ प्रेमाचा,साक्षात्कार घडवण्याच्या दृष्टीने अप्रतिम तर आहेच पण त्याचबरोबर ग्रहगोलाविषयीच्या आपल्या शास्त्रीय ज्ञानाचा कलादुष्ट्या किती श्रेयस्कर उपयोग करून घेता येतो याचेही या गीतात अपवादात्मक पण समर्थ असे प्रत्यंतरही आपल्याला मिळते. त्या दृष्टीने ही कविता जितकी अपुर्व तितकीच अभ्यसनीयही आहे. शृंगाराला उदात्ताची इतकी उंत्तुग बैठक आणि तीही इतक्या कलापुर्ण रीतीने देणारी असली दुसरी कविता दुर्मिळच म्हटली पाहिजे.या कवितेतले कुसुमाग्रजांचे यश अनन्यसाधारण आहे.

    उत्तर द्याहटवा