शनिवार, ७ फेब्रुवारी, २००९

नट मित्रास पत्र - गोविंदाग्रज

ज्येष्ठ बंधो ! साष्टांग नमस्कार !
बांधवाचा घे आधिं गुणाधार ।
मान्य करुनी ही विनंती विशेष
वृत्त ऐकें सप्रेम मम अशेष ॥१॥

पत्र पूर्वीं तुज पाठविलें त्याचें
त्वरें प्रत्युत्तर खास यावयाचें ।
असें आधीं घेतलें मन्ममनानें
परी ठरलें भलतेंच अनुभवानें ॥२॥

पाहुनियां परि गद्य पत्र याचें
कठिण तुमचें मन, कठिण द्रवायाचें ।
शब्दसुमनांचा म्हणुनि करुनि झेला
पाठवीं मी; हा तरी वरिच झेला ॥३॥

जरा तुमच्या मी दृष्टिआड होतां
सृष्टिआडहि झालोंच काय आतां ?
वाढलें हें जरि अंतर स्थळाचें
काय प्रेमांतहि तेंच व्हावयाचें ? ॥४॥

आळसानें कां हा प्रकार झाला ?
पात्र किंवा मी नसें उत्तराला ?
राग अथवा का अजुनि नाहिं गेला ?
प्रेमसिंधुच कीं मुळीं शुष्क झाला ? ॥५॥

निकट असतां जो स्नेह दाखवीला
भासला तो तें सत्य मन्मतीला ।
आजि कळला परि खरा अर्थ त्याचा
मासला कीं तो तुझ्या अभिनयाचा ! ॥६॥

खरा नट तूं, रे नटवरा, खराच
तारतम्याचें ज्ञान परि न साच ।
अभिनयाची तुज शक्ति तर असावी
समय पाहुनि ती परी दाखवावी ॥७॥

रंगभूमी अभिनयें भूषवावी
तीच वृत्ती सर्वत्र परि नसावी ।
कालपत जरि दृष्टीस आड आला
तरि न विसरावें कधीं मित्रतेला ॥८॥

एकटयासचि तुज दोष देत नाहीं
वृत्ति सर्वांची हीच दिसत पाहीं ।
कांहिं काळें भेटतां तुम्हां कोठें
ओळखीसहि विसराल असें वाटे ॥९॥

ओघ कवितेचा येथवरी चाले
पत्र तुमचें इतक्यांत हेंच आलें ।
खिन्न माझें मन सु-प्रसन्न होत
प्रवाहाचा बदलुनी रोख जात ॥१०॥

पुढिल कार्यक्रम अजुनि ठाम नाहीं
परस्वाधिन ही गोष्ट असे पाहीं ।
छत्रपतिच्या पत्रांत परि तयाचा
कांहिं केला उल्लेख तोच वाचा ॥११॥

लेखनाचें कौशल्य फार माझें
तुझा उपहासच त्यास योग्य साजे ।
लिहित बसणें तुम्हांस नित्य पत्रें
लेखनाचें कौशल्य हेंच सारें ॥१२॥

असें वरचेवर पत्र पाठवावें
आणि प्रकृतीतें नित्य जपत जावें ।
उण्या-अधिकाचा राग नच धरावा
भूतकालासह तोहि भूत व्हावा ॥१३॥

बहुत लिहिणें वद काय याहुनीहि
विनति नित्याची लोभ असावा ही ।
काव्यदेवीतें द्यावया विराम
घेइ आज्ञा---
आपला---
मित्र,
’राम’ ॥१४॥

ओवी
मुक्काम-नागपूर शहर
वार-पवित्र गुरुवार ।
तारीख-एकोणीस नोव्हेंबर
एकोणीसशें आठचि ॥१॥

एखाद्याचें नशीब - गोविंदाग्रज

कांहीं गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,
कांहीं ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
कांहीं जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एकादें फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !

मानूस - बहीणाबाई चौधरी

मानूस मानूस

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !

बुधवार, ४ फेब्रुवारी, २००९

कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत - केशवकुमार

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

या प्रभातसमयास मंगल,
चमकती दंवमौक्तिक निर्मल,
गात पक्षिगण हा गगनी फिरे,
पण दशा तव काय अर-अरे!

ओसरीवरुनि या तव मैत्रिणी
गात स्वैर फिरतात सुलक्षणी
परि तुला न बघती मुळि ढुंकुनी
'संकटी जगि कुणा न असे कुणी!'

मंडई नव्हति का तुज मोकळी,
की मिठाइ 'मघुरा-भुवनांतली,
नव्हति का 'उपहार-गृहे' खुली,
म्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,
मनुजवस्तित आलिस का इथे!

करीत 'दत्तु-भट' काय तपासणी
म्हणुनि घाबरुनि आलिस तू झणी!
शर्कराकण येथिल सांडले
सेवुनी न तुज सौख्य जाहले?

की 'यमी' करिंचे गुळखोबरे,
शमवि भूक न काय तुझी बरे?
पेय बोलुनिचालुनि घातकी,
बुडविते बघ भारतियास की,

या अशा व्यसनात विलायती,
अडकता फळ दारुण शेवटी !
नर जसा बुडतो भवडोही
तेवि खालिवर जासि अयाई!

काडि वाचवि जरी बुडत्याला,
काडिचा न परि आश्रय गे तुला!
स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.
बघु तरी उघड्या नयनी कशी?

अंगि तेवि भरले भयकापरे,
आणि त्यात निवला न चहा बरे!
हाय! सोडुनि जाशिल ना अम्हा,
छे, सले नुसती मनि कल्पना?

समिप पाउसकाळहि पातला,
आणि तू निघुनि जाशिच आजला!
अहह, आम्रफल-मोसम येईल,
अम्हि असू परि तू नसशील!

फेकु सालटि चोखुनि चोखुनि,
तुजविना पण जातिल वाळुनी
तुजविना कवि-मुखे दिसतील की,
भृंगहीन कमळांसम ती फिकी,

कौन्सिलात, सभासद आणी,
मारतील कवणा तुजवाचुनी?
राजकारण रोज नवे नवे,
राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.

शिंकुनि अहह! देइल त्यापुढे,
त्या इशारत कोण तरी गडे?
यापरी नव-तरंग मनात
येउनी ह्रदय होय कंपित.

पेयपृष्ठि उठली इतुक्यात,
मंद-श्वास,-लहरीसह लाट!

फड फड फड पंखा हालवी ती तराया,
तडफड बहु केली जाहले कष्ट वाया,
मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,
अहह, तडक आणी खालती खोल गेली!

टाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,
चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती - बा.भ.बोरकर

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती

जिथे विपत्ती जाळी, उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती..

निर्माल्य

होता मोहरला व संत वितरी मार्गावरी तो फुले
होते धुंद सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,
स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर
आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा
झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा
मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी
वाहे मन्थर आणि जीवनमयी त भावमन्दाकिनी !

साधी वेषतर्‍हा तयातहि खुले ती आकृती लालस
डोळ्यातूनच भावबन्ध जडले-प्रीती असे डोळस !
जाण्याला निघसी अचानक पुढे, व्याकूलसी पाहुनी,
गंगा लोपुनी गर्जना करित तो सिंधूच नेत्रांतुनी !

आणी गेलिस तू-वसन्तहि सखे गेला तुझ्या संगती,
पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती !