गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

डोळा वाटुली संपेना - इंदिरा संत

इथे रंगली पंगत
मिटक्यांची भुरक्यांची :
साधासुधा माझा हात,
बाळजीभ अमृताची;

इथे चालला अभ्यास,
इथे झाली भातुकली,
गोष्टी, गाणी नि मस्करी :
खोली भरून राहिली;

इथे घडले पतंग
इथे फिरला भोवरा,
इथे हदगा मांडला,
इथे खुडला मोगरा;

खेळा-शाळेच्या मागून
दूर दूर दिसाकाठी;
सांजावता, दारामधे
कमरेला घट्ट मिठी.

दिसामाशी वाढताना
घर झाले हे लहान;
पालवीत पंख नवे
गेली त्याच दारातून!

सांज टळली तरीही
दार लावावे वाटेना,
"वळेल का कुणी मागे?"
डोळा वाटुली संपेना....

--संपावया हवी वाट,
लावावया हवा दिवा;
पोटासाठी मुकाट्याने
हवा टाकायला तवा!

सांगावा - इंदिरा संत

किती धाडला सांगावा:
मला येऊनिया न्यावे;
चोळमोळा झाला जीव,
किती त्याला शिणवावे!

किती पाहिली मी वाट
असे सांगावे धाडून;
केली कितीद तयारी
सारे काही आवरून

अंगणात संमार्जन,
दारा सतेज तोरण,
सारविल्या भुईवरी
स्वस्तिकाचे रेखाटण;

चूलबोळकी, बाहुल्या
दडपिल्या पेटाऱ्यांत;
लख्ख लख्ख सारे काही
निघायच्या तयारीत.

कसा नसेल पोचला
एक सांगावा येथून?
कसे नसेल ठाऊक
इथे मोजते मी क्षण?

दक्षिणेच्या झंझावाता,
कधी येणार धावत :
माझे मातीचे हे घर
कधी घेणार मिठीत?

सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

बरसात - शांता शेळके

संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत
त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा
जसा पाण्याचा झुळझुळनितळ जिव्हाळा
जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा.

संबंधांचे धागे कधीच उलगडू नयेत
ते फक्त प्राणांभोवती सहज घ्यावेत लपेटून,
जसे हिवाळ्यातल्या झोंबऱ्या पहाटगारठ्यात
अंगांगी भिनवीत राहावे कोवळे धारोष्ण ऊन्ह.

संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता....
एक धागा... जपून ठेवावा खोल हृदयात
एखादे रखरखीत तप्त वाळ्वंट तुडवताना
माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात...

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

डोंगरी शेत - नारायण सुर्वे

[कै. कवी नारायण सुर्वे ह्यांना आदरांजली]

डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?

आलं वरिस राबून मी मरावं किती?

कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?

आलं आलं वरीस जमिन नांगरुन
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून आम्ही मरावं किती?

या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरात पडंना
टीचभर पोटाला, हातभर देहाला जपावं किती?

अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला

तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास एकीचं निशाण हाती

सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

क्षितीज रुंद होत आहे - नारायण सुर्वे

आज माझ्या वेदनेला
अर्थ नवा येत आहे
आणि मेघांच्या डफावर
थाप बिजली देत आहे
आज मरण आपुल्याच
मरणाला भीत आहे
आणि मृत्युंजयी आत्मा
पुन्हा धडक देत आहे
आज शुष्क फांद्यावर
बहर नवा येत आहे
भूमीच्या गर्भामधुनी
बीज हुंकार देत आहे
आज सारे गगन थिटे
नजरेला येत आहे
काळोखाच्या तबकडीत
सूर्य गजर देत आहे
आज तडकलेले मन
एकसंध होत आहे
आणि उसवलेले धागे
गुंफूनीया देत आहे
आज माझ्या कोरड्या गा
शब्दात आग येत आहे
आणि नव्या सृजनाचे
क्षितीज रुंद होत आहे.

माझी आई - नारायण सुर्वे

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू
शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पांचानी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.

सोमवार, १२ जुलै, २०१०

माणुसपण - कुसुमाग्रज


प्रसन्न झाला देव मानवा
म्हणे, ’माग तुज काय हवे ते’,
’शस्त्र हवे मज’, माणूस वदला
’साध्य सर्व हो पराक्रमाते’


शस्त्र मिळाले, हो समरांगण
अवघ्या भूचे हृदय विदारी
माखुनिया रक्तात राहिला
पुन्हा उभा देवाच्या द्वारी!


’काय हवे तुज ?’ शस्त्र न पुरते-
करील शास्त्रच मंगल जीवन
ज्ञानसाधनी ये ईश्वरता
स्वर्गधरेचे करीन मीलन


शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले
स्वर्ग परी स्वप्नातच राही.
मानव हतबल आणिक हताश
पुन्हा प्रभुच्या सन्निध येई.


’काय हवे तुज ?’, ’वावरलो मी-
वाट दिसेना या तिमिरांतून
देव म्हणे, तुज जवळीच आहे
दीप लाव तो, तव माणुसपण!


लोकसत्ता. मंगळवार, २ ऑगस्ट २००५