मंगळवार, २३ सप्टेंबर, २००८

मृग - ग. दि. माडगुळकर

मृग

माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

aaplya upakramas shubhechha !!

sobat kahi kavita det aahe.

समजावना

किती सहज उतरवून ठेवलीस तू
पिकलेली पानं
हिरव्याच्या स्वागतासाठी !
मी मात्र
उगीच केली खळखळ
नि आता आपसुक होत असलेल्या
पानगळीला घाबरते आहे !
किती सहज गृहीत धरलंस
तू हिरव्याचं आगमन
आणि गिळून टाकलीस पानगळ !
मला मात्र
पानगळच गिळते आहे !
आपसुकच होईल
हिरव्याचं आगमन
हे मलाही समजावना !

आसावरी काकडे (आकाश)

कळत नाही

छातीवर दगड जरी ठेवला
तरी ही हिरवी पाने
कुठून फुटतात कळत नाही

कितीही म्हटले की मी सुखी आहे
तरी माझ्या गीतातून
मन का रडते कळत नाही

कुणा अव्यक्ताशी माझे नाते जडले आहे
म्हणून मी माझा नाही
आणि सये, तुझाही नाही

छातीवर दगड जरी ठेवला
तरी ही हिरवी पाने
कुठून फुटतात कळत नाहे

- म.म.देशपांडे (वनफूल)

स्वत:चं सामान्यत्व फार छळू लागलं की
म्हातारीच्या पिसाकडे बघावे. स्वच्छंदपणे कसे उडत असते हवेत.
आपल्याला कोणी गरूड म्हणत नाही याची त्याला खंत नसते.
बळकट पंख नसल्याचा खेद नसतो. आकाशाचा अंत गाठण्याचा हव्यास नसतो.
अन पृथ्वीचा ठिपका होऊन जाण्याइतकी उंची गाठण्याचा मोहही नसतो.
आपल्या मस्तीत भिरभिरत, हवेशी जुळवून घेत,
आपल्या हलक्या अस्तित्वाला सहजपणे स्विकारत, ते मजेत जगून घेते.
उंचावर गेल्यावर त्याला जमिनीची भीती नसते.
अन् जमिनीवर उतरल्यावर नसतो आकाशाचा मोह.

म्हणूनच स्वत:चे सामान्यत्व छळू लागलं की
बघावे
नि:संग भिरभिरणाऱ्या म्हातारीच्या पिसाकडे.

- संजीवनी बोकील

संवेदनांच्या बाणांची टोकं
बाहेर वळली की
जखमा होतात
आणि
आत वळली की कविता !!

- संजीवनी बोकील