गुरुवार, २६ एप्रिल, २००७

झाले कोकण पारखे - जयन्त खानझोडे

झाले कोकण पारखे

झाले कोकण पारखे
आता पुन्हा भेट नाही
आत्याबाईच्या मायेची
आता पुन्हा गाठ नाही.

आता नाही व्हावयाचा
हवाहवासा प्रवास
आता जाईल उन्हाळा
कसा उदास उदास

नाही पोफळीच्या बागा
आणि नारळाची झाडे
आता दर्शन का ह्यांचे
फक्त स्वप्नातून घडे

निळे हिरवे डोंगर
पुन्हा नाही दिसायचे
झुळझूळत्या झर्यात
पुन्हा कधी डुंबायाचे?

कैक वर्षांचा शिरस्ता
बघा आता चुकणार
मने ताजी करणारी
यात्रा नाही घडणार

आता शेवटची खेप
द्याया तिला तिलांजली
कोकणची माती आता
लागणार नाही भाळी

योग सरता भेटीचा
कधी भेटते का कोणी
आता राहतील फक्त
कोकणच्या आठवणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: