शुक्रवार, १६ मार्च, २००७

तोपची - ग.दि.माडगूळकर

आचार्य अत्रे कालवश झाल्याची बातमी ऐकल्यावर गदिमांनी ही कविता रचली.

मुलासारखा हट्टी अल्लड
स्वभाव होता सहज जयाचा
त्यास उचली कैसा काळ
हिशोब करून वयाचा

उन्मत्तांच्या शिरी बैसला
घाव जयाचा अचूक अगदी
परशुराम तो आज परतला
परशु आपली टाकून स्कंधी

सर्वांगांनी भोगी जीवन
तरीही जयाच्या अंगी विरक्ती
साधुत्त्वाचा गेला पूजक
खचली, कलली श्री शिवशक्ती

भरात आहे अजुनी लढाई
न्यायासंगे अन्यायाची
आग बरसती तोफ अडखळे
आघाडीचा पडे तोपची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: