मंगळवार, २० फेब्रुवारी, २००७

आगगाडी आणि जमीन - कुसुमाग्रज

शिरवाडकरांची ही कविता रुपकात्मक आहे. दलित-वर्गावर होणाऱ्या अत्याचारांचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे हे चित्रण आहे.

रुपकात्मक नसली तरी केवळ शब्दांचा लाडिवाळ अशा दृष्टीनेही ही कविता वाचनीय ठरते. कुसुमाग्रजांची भाषा सुबक मोत्यासारखी आहे. ते नवीन जाणीव घेऊन आलेले, संवेदनशील नवीन कवी आहेत - केवळ भाषेची सर्कस करणारे नवकवी नव्हेत.



नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून -

धावसी मजेत
वेगत वरून
आणिक खाली मी
चालले झुरुन

या ओळींच्या यमक-प्रासात रेल्वे गाडीच्या गतीचा ताल ऐकू येतो.

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितिक ढाळसी
वरून निखारे!

नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेहोष होऊन.

आगगाडी मात्र स्वतःच्या मस्तीत गुर्मित म्हणते -

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन! धावेन!

(आगगाडीचा ताल संपूर्ण कवितेत जाणवतो)

या उन्मत्त गाडीचे बोल ऐकून जमीन सूडाने पेटून उठते.

हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!

जमीनीच्या ताकदीपुढे गाडीचे काहीही चालले नाही -

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडती खालती!

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

या कवितेचा सारांश