गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

विरामचिन्हे - केशवकुमार

जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला, 

जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला, 

तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे, 

तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे ! 

झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका? 

याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका? 

रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल? 

सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल! 

अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली, 

अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली ! 

कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये ! 

केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये ! 

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी, 

केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी ! 

माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन ! 

त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन ! 

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी 

ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी - 

सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला, 

देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: