बुधवार, १८ एप्रिल, २००७

तुतारी - केशवसुत

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

७ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Sundar ahe hi kavita konihi bhutakal visarun navya aushakade vatachal kashi karavi te hi kavita vachun kalel

Unknown म्हणाले...

कोणत्याही काळासाठी लागु असणारी कविता.

Unknown म्हणाले...

1996 च्या वर्ग 10 मधल्या मराठी पुस्तकातली ही कविता आहे

Unknown म्हणाले...

प्राचीन काळापासून चालत असलेले काही आदर्श काही तंत्रज्ञान कसे काय त्याज्य मानायचे.हेच इतर दोन धर्माच्या बाबतीत असे कोणी लिहील का ?

Unknown म्हणाले...

Vishleshan

Shirish Dhage म्हणाले...

हीच तर हिंदू धर्माची विशेषता आहे.सती ची प्रथा नष्ट करायला लावणारे राजा राममोहन रॉय,आधुनिक हिंदुत्वाची द्वाही जगभर फिरविणारे स्वामी विवेकानंद,स्त्री शिक्षण जागर करणारे महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई,विधवा पुनर्विवाहाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे ,जातीयते विरुद्ध आवाज उठवून उपेक्षितांना शिका म्हणून सांगणारे गाडगे महाराज आणि इतर अनेक थोर लोक होऊन गेले ज्यांच्या कष्टाचे,परिश्रमाचे फळ आज आपण पाहत आहोत.कल्पना करा,प्राचीन काळातील तथाकथित आदर्शांना आपण कवटाळून बसलो असतो तर आपल्या विधवा अय बहिणींना आपल्या समोर जाळले गेले असते किंवा केश वपन करून बोडकीचे जीवन अंधारात काढावे लागले असते,न शिकता चूल आणि मूल करीत आयुष्य घालवावे असते,खालच्या वर्गातील हिंदू बांधवांना पिढ्यान पिढ्या उष्टे खात लाचारीचे आणि उपेक्षेचे जीवन कंठावे लागले असते.हे आपणांस हवे असल्यास गोष्ट निराळी.पण दुसऱ्या धर्मांचा दाखला देऊन सहानुभूती अजिबात मिळणार नाही.

Unknown म्हणाले...

यातील एक कडवे गाळलेले आहे.
देव दानवा नरे निर्मिले.....