रविवार, ६ फेब्रुवारी, २०११

गझल उपदेशाचा - विंदा करंदीकर

तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको;
मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको.

आत्मास आत्म्याचे मिळे; ते कोण घेईल काढुनी?
पण इंद्रिया दरडावुनी शरिरास तू हिणवू नको

मोठ्यास मोठे मान तू, त्याहून मोठे चिंतता;
पण आपणाही फार छोटे तू उगा मानू नको

खोटा गळा काढू नको; खोटा टिळा लावू नको;
जीव जडतो त्या ठिकाणी पाय तू अडवू नको.

विवेक, संयम, नम्रता असले सदाचे सोबती,
तरि व्हायचे वेडे जिथे तेथे मढे होऊ नको.

खुश्शाल जा तू मंदिरी, त्याला-तिला देण्या फुले;
पण त्यातल्या एका फुला हुंगावया विसरु नको.

पोचायचे जेथे तिथे ना ऊन आणिक सावली,
म्हणुनी वडाच्या खालती अस्वस्थ तू होऊ नको.

1 टिप्पणी:

Priyadarshan Sahasrabuddhe म्हणाले...

धनू: आत्म्यास आत्म्याचे मिळे...
असे असावे ते